श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान
———————————
यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान
———————————
अणदूर,News धाराशिव लक्षवेध
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करारपद्धतीने देव देण्या-घेण्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा (सटीची जत्रा) शुक्रवारी मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक कार्यक्रमाने पार पडली.सोमवारी पहाटे चार वाजता काकडा आरतीनंतर परिसरातील भाविक दंडवत घालून आपापले नवस फेडणे,सकाळी ९ वा.श्रींंच्या मुर्तीला अभ्यंगस्नान घालून अभिषेक व विविध धार्मिक विधी पुर्ण करण्यात आली.दिवसभर मंदिरात भाविक तळीभंडार उचलणे,ओटी भरणे,भंडार-खोबरे उधळणे,लहाण मुलांचे जावळ काढणे,लंगर तोडणे,नवीन मुरळी, वारुंना दिक्षा देणे आदी कार्यक्रम पार पडले.सायंकाळी मानाची काठी मिरवणुक,वाघ्या-मुरळी नृत्य आदी कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडले.
रात्री दहा वाजता श्रींंचा अश्वरुपी सवाद्य छबीना काढून मंदिराला दोन प्रदक्षिणा घातल्या जातात.यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारु बेभान होवून नाचतात.हे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहातात छबीना मिरवणुकीनंतर जेष्ठ वारुकडून आगामी वर्षाची भाकनूक(भविष्य) सांगितले जाते.रात्री बारा वाजता नळदुर्गचे मानकरी श्रींंच्या मुर्तीला मैलारपूर(नळदुर्ग) येथे नेण्यासाठी सवाद्य मिरवणुकीने येतात.यावेळी त्यांचे स्वागत करुन यात्रा कमिटीच्या वतीने मानपान देवून दोन गावांमध्ये देव देण्या-घेण्याचा करार होवून दोन्ही गावातील पंचाच्या सह्या होतात.त्यानंतर महाआरती होते.मैलारपूर(नळदुर्ग) येथे पौष पौर्णिमेदिवशी होणाऱ्या उत्सवासाठी हेगडी प्रधानांंसह म्हाळसादेवीच्या मुर्तीचे प्रस्थानानंतर श्रींंच्या मुर्तीला पालखीतून निरोप देण्यात येतो. पहाटे पाच वाजता मैलारपूर येथील मंदीरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
उद्या दुपारी जंगी कुस्त्यांचे आयोजन –
श्री खंडोबा यात्रेनिमित्त उद्या शनिवारी दुपारी जवाहर महाविद्यालयाच्या कुस्ती आखाड्यात भव्य कुस्त्यांचा फड होणार आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. या कुस्ती स्पर्धेत १०० रुपये पासून लाख रूपये पर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर मल्लांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान –
अणदूर येथील कट्टा ग्रुप यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान सेवा करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.







