धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी शिक्षण विभागासह विविध शासकीय विभागांकडे निवेदन सादर करण्यात आले असून, लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली आहे.
निवेदनानुसार, शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून D.El.Ed. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या ₹3,300 वार्षिक ट्युशन फीऐवजी ₹6,500 इतकी फी आकारण्यात आली. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याकडून ₹3,200 अतिरिक्त रक्कम घेतल्याचा आरोप आहे. दरवर्षी सुमारे 100 विद्यार्थ्यांकडून अशी वसुली झाल्याने गेल्या आठ वर्षांत सुमारे ₹25 लाखांची अतिरिक्त रक्कम गोळा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, ही अतिरिक्त रक्कम रोख स्वरूपात घेण्यात आली असून अनेक विद्यार्थ्यांना अधिकृत पावती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाची दिशाभूल, विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक तसेच आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
अनुदानित अध्यापक विद्यालयाची मान्यता व शासन अनुदान तात्काळ रद्द करण्यात यावे.
प्रभारी प्राचार्य श्री. पवार दत्तात्रय हरीभाऊ यांच्यावर IPC कलम 420 व 120(B) अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थ्यांकडून कथितरित्या वसूल करण्यात आलेली ₹25 लाखांची रक्कम व्याजासह परत करण्यात यावी.
राज्य सीआयडी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी.
या अधिकाऱ्यांकडे निवेदन आयुक्त, शिक्षण विभाग, पुणे
जिल्हाधिकारी, धाराशिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक),धाराशिव संचालक, SCERTशालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र
निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागांनी तातडीने कारवाई न केल्यास या संपूर्ण प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेप व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.





