ग्राम रोजगार सेवकांच्या संपामुळे सिंचन विहिरींची कामे ठप्प; पर्यायी व्यवस्था करण्याची जि.प सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांची मागणी
अणदूर,(लक्ष्मण नरे)
जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या संपामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) सुरू असलेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींच्या कामांवर मोठा परिणाम होत असून अनेक कामे ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र गुरुनाथ कानडे यांनी गट विकास अधिकारी (BDO) यांना शुक्रवारी (दि.१५) रोजी निवेदन देत तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्राम रोजगार सेवक संपावर गेल्यामुळे ‘मस्टर जनरेशन’ प्रक्रिया बंद पडली आहे. त्यामुळे नवीन मस्टर निघत नसून मजुरांची उपस्थिती नोंदवली जात नाही. परिणामी अनेक सिंचन विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत.
सध्या पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले असून आता बांधकाम (Curb /Lining) कामे तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र मस्टर उपलब्ध नसल्याने कामे रखडली असून पावसाळ्यात विहिरी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच शासनाच्या नियमानुसार मजुरांना १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक असतानाही तांत्रिक अडचणींमुळे मजुरांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. कानडे यांनी प्रशासनाने तातडीने पर्यायी अधिकारी किंवा तांत्रिक सहाय्यकांकडे मस्टर काढण्याची जबाबदारी सोपवावी, तसेच सुरू असलेली विहिरींची कामे सुरळीत सुरू ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.यावेळी हे निवेदन पंचायत समिती, तुळजापूर येथे सादर करण्यात आले आहे यावरती गटविकास अधिकारी (BDO) काय निर्णय घेतात ते पाहणे गरजेचे आहे.





